महाराष्ट्रात आडसाली व पूर्वहंगामी ऊस लागवडी घटल्या

पुणे : राज्यात सध्या आडसाली व पूर्वहंगामी ऊस लागवडी कमी झाल्याचे दिसून येत आहे. उसाच्या आगारात आतापर्यंत आडसाली, पूर्वहंगामी उसाच्या चार लाख २८ हजार ३८ हेक्टरवर लागवडी झाल्या आहेत. उन्हाळ्यात उपलब्ध झालेला ऊस चाऱ्यासाठी जाणार असल्याने साखर कारखान्यांचा आगामी गळीत हंगाम अडचणीत येण्याची शक्यता आहे. राज्यात सरासरीच्या दहा लाख ९५ हजार ७५ हेक्टरपैकी चार लाख २८ हजार ३८ हेक्टर म्हणजेच ३९ टक्के क्षेत्रांवर ऊस लागवडी झाल्या आहेत.

पुणे, नगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर अशा जिल्ह्यांत ऊस लागवडी घटल्याचे चित्र आहे. मराठवाडा व विदर्भातही फारशा लागवडी झालेल्या नाहीत. दरवर्षी शेतकरी आडसाली उसाच्या लागवडी १५ जुलै ते १५ ऑगस्ट या दरम्यान करतात. तर १५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेबर या कालावधीत पूर्वहंगामी उसाच्या लागवडी केल्या जातात. सध्या सुरू असलेल्या उसाच्या लागवडी पाण्याअभावी त्यासुद्धा खोळंबल्या आहेत. ऑक्टोबर पडलेल्या कडक उन्हामुळे जमिनीत पुरेशी ओल नसल्याने ऊस लागवडी कमी प्रमाणात झाल्या आहेत. गेल्यावर्षी याच काळात ६ लाख ४ हजार ३८५ हेक्टर म्हणजेच ५५ टक्के लागवड झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी तब्बल एक लाख ७६ हजार ३४७ हेक्टरने घट झाली असल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here