लॉकडाउनमुळे जीडीपीचे १.५ लाख कोटी रुपयांचे नुकसान शक्य

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन अथवा अंशतः लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे जीडीपीचे सुमारे १.५ लाख कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. यापैकी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये ८० टक्के हिस्सा आहे. एसबीआयच्या रिसर्च रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे.

एसबीआय रिसर्च रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, विविध राज्यांमध्ये सद्यस्थितीत लॉकडाऊनमुळे जे नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामध्ये महाराष्ट्राचा हिस्सा ५४ टक्के इतका आहे. आमच्या सध्याच्या अनुमानानुसार महाराष्ट्रात सुमारे ८२००० कोटी रुपयांचे नुकसान होईल. पुढे नियम अधिक कडक झाल्यावर त्यामध्ये वाढ होऊ शकते. दुसरीकडे मध्य प्रदेशमध्ये सुमारे २१,७१२ कोटी रुपये तर राजस्थानमध्ये १७,२३७ कोटी रुपये नुकसान होण्याची शक्यता आहे.

सद्यस्थितीत कोरोनाचे उच्चांकी रुग्ण आढळत असल्याने महाराष्ट्र आणि एनसीआरच्या काही भागात गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊन अथवा आंशिक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्रात विकेंडला लॉकडाऊन आणि नाइट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. अशाच पद्धतीचे निर्बंध मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये ठिकठिकाणच्या शहरांमध्ये आहेत. मध्य प्रदेशातील १५ जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. राजस्थानमध्ये ३ मे पर्यंत लॉकडाऊन लागू केला गेला आहे.

विकास दराचा अंदाज घटला
एसबीआय रिसर्चने कोविड १९च्या दुसऱ्या लाटेतील निर्बंधामुळे आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये देशाच्या जीडीपी वाढीचा अंदाज घटवून १०.४ टक्क्यांवर आणला आहे. यापूर्वी हे अनुमान ११ टक्क्यांवर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here