औरंगाबाद : उस्मानाबाद येथील धाराशिव साखर कारखान्याने इथेनॉल युनिटमध्ये किरकोळ बदल करून मेडिकल ऑक्सिजन प्लांट स्थापन करण्यात यश मिळवल्यानंतर आता महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या २० इथेनॉल डिस्टिलरी युनिट यासाठी इच्छुक आहेत. अशा प्रकारे ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याची तयारी त्यांनी केली आहे. एवढेच नव्हे तर उत्तर प्रदेश सरकारने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपूर्वी ऑक्सिजन उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी १५ इथेनॉल प्लांटमध्ये उस्मानाबाद पॅटर्न लागू करण्याची तयारी केली आहे.
यासाठी आधीच मेडिकल ऑक्सिजन उत्पादन करण्यासाठी लागणाऱ्या उपकरणांची ऑर्डर देण्यात आली आहे. तैवान, कोरिया आणि अमेरिकेकडून कॉम्प्रेसर आयात करण्यात येत आहेत राज्यात १९५ साखर कारखाने आहेत. त्यापैकी १३७ कारखान्यांमध्ये इथेनॉल प्लांट आहेत. याशिवाय राज्यात बाराहून अधिक स्वतंत्र इथेनॉल युनिट आहेत.
उस्मानाबाद साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी देशात पहिल्यांदाच आपल्या धाराशिव साखर कारखान्याच्या इथेनॉल प्लांटमध्ये बदल करून मेडिकल ऑक्सिजन उत्पादन सुरू केले, ते आता देशातील सर्व साखर कारखान्यांची मदत करीत आहेत. पाटील म्हणाले, आमच्या युनिटने देशातील सर्व साखर कारखान्यांना अशा प्रकारची चालना दिली ही आनंदाची बाब आहे. फक्त महाराष्ट्रातच २० जणांनी ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर यापैकी दोन जणांनी आवश्यक उपकरणांची ऑर्डरही दिली आहे.
सद्यस्थितीत पाटील यांच्या युनीटमधून ९६ टक्के शुद्ध ऑक्सिजनचे उत्पादन होते. एका आठवड्यात युनीटमधून २० टन ऑक्सिजन निर्मिती होत आहे. ही उस्मानाबाद जिल्ह्याच्या गरजेपेक्षाही अधिक आहे.