मुंबई : महाराष्ट्रातील साखर उद्योगातील विविध समस्या आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी इथेनॉल उत्पादन वाढीसाठी धोरण ठरविण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. वसंतदादा शुगर इन्सिट्यूटचे (व्हीएसआय) अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहित दिली. पवार यांनी सह्यादी अतिथिगृह येथे साखर उद्योगातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी बैठक आयोजित केली होती.
याबाबत सोशल मीडियावर पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी साखर उद्योगातील समस्या व त्यावर तोडगा काढण्यासंदर्भात लक्ष घालण्याची विनंती पवार यांना केली होती. त्यांनी याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्यांशी सविस्तर चर्चा करण्याची सूचना पवार यांनी केली. त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली साखर उद्योगांच्या अडी-अडचणींच्या सोडवणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत सह्याद्री अतिथिगृहात पार पडली असे पवार यांनी म्हटले आहे.
या बैठकीस उपस्थित राहून संबंधित समस्यांवर सकारात्मक मार्ग काढण्यासाठी काही सूचना पवार यांनी केल्या होत्या. बैठकीत इथेनॉल उत्पादन वाढीकरता समोचित शासकीय धोरण व अर्थसहाय्याची घोषणा, उद्योगांकरता सौर ऊर्जा प्रकल्पांची उभारणी, साखर कारखान्यांच्या कर्जांचे पुनर्गठन आदी बाबींवर विस्तृतपणे चर्चा झाली. यासोबतच साखर कामगारांच्या वेतनवाढी संदर्भात महाराष्ट्र राज्य साखर कामगारांचे प्रतिनिधी मंडळ व साखर संघाच्या प्रतिनिधींसमवेत बैठक पार पडली. महागाई निर्देशांक आणि साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती या दोन्ही बाजूंचा विचार करून योग्य वेतनवाढ करण्याबाबत सर्व प्रतिनिधींनी सहमती दर्शवली अशी माहितीही पवार यांनी दिली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link