महाराष्ट्रात २०२१-२२ या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर साखर कारखान्यांनी सहभाग घेतला आहे. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार हंगाम २०२१-२२ मध्ये १९ जानेवारी २०२२ अखेर महाराष्ट्रात एकूण १९२ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये ९५ सहकारी आणि ९७ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ६२५.३८ लाख टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत ६२०.८२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ९.९३ टक्के आहे.
राज्यात सर्वाधिक साखर कारखाने सोलापूर विभागात कार्यरत आहेत. सोलापूरमध्ये सर्वाधिक ४५ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. येथे १९ जानेवारी २०२२ अखेर १४८.७५ लाख टन उसाचे गाळप करून १३३.१७ लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे.
राज्यात सर्वाधिक साखर उत्पादन कोल्हापूर विभागात झाले आहे. कोल्हापूर विभागात आतापर्यंत १५०.२६ लाख टन उसाचे गाळप करून १६९.९१ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. येथील साखर उतारा ११.२७ टक्के आहे.
पुणे विभागात हंगाम २०२१-२२ मध्ये १९ जानेवारी २०२२ पर्यंत एकूण २९ कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये १६ सहकारी तर १३ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत १२६.९१ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. पुणे विभागात १२८.३० लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. पुणे विभागाचा सरासरी साखर उतारा १०.११ टक्के आहे.