मुंबई : गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्र ऊस उत्पादनात अग्रेसर राज्य होते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून उत्तर प्रदेश देशात पहिल्या क्रमांकाचे ऊस उत्पादक राज्य बनले आहे.
याबाबत टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्रात ऊस उत्पादनात सुरू असलेल्या घसरणीमुळे चिंतेत पडलेल्या सरकारने साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ११ सदस्यांची समिती स्थापन केली आहे. ही समिती उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादन मॉडेलचा अभ्यास करेल. गायकवाड यांच्याशिवाय शुगर को ऑपरेटिव्ह रिसर्च इन्स्टिट्यूट, वेस्टर्न इंडिया को ऑपरेटिव्ह शुगर मिल्स फेडरेशन आणि इतर संघटना या समितीच्या सदस्य आहेत.
उपलब्ध आकडेवारीनुसार गेल्या वर्षी उत्तर प्रदेशातील ११०.६ लाख मेट्रिक टनाच्या तुलनेत महाराष्ट्रात ऊस उत्पादन १०६.३ लाख मेट्रिक टन झाले होते. यंदा महाराष्ट्राने उत्तर प्रदेशच्या १२० लाख मेट्रिक टनाच्या तुलनेत ११२ लाख मेट्रिक टन उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवला आहे. राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीकडून उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादन पद्धतीचा अभ्यास केला जाणार आहे. तेथील पद्धती आपल्या राज्यात लागू करण्याबाबत विचारविनिमय केला जाऊ शकतो.