महाराष्ट्रात गारपिटीमुळे नुकसान झालेल्या ऊस पिकाचे व्यवस्थापन: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणावर गारपिट व वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे
शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या पिकांची प्रचंड हानी झाल्याचे दिसून आले आहे. ऊस या महत्वाच्या नगदी पिकाची
सुद्धा मोठी हानी झाल्याचे दिसून आले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये झालेल्या गारपिटीमुळे ऊस पिक
पाहणीनुसार वेगवेगळ्या विभागात साधारणपणे अर्धा ते एक तासभर मोठ्या वादळाबरोबर गारपीटही झाली.
त्यामुळे शेतामध्ये व रस्त्यावर गारांचा थर साचलेला होता. गारांच्या तडाख्यामुळे ऊस पिकाची पाने पूर्णपणे
छाटली गेली व ऊसाच्या पानाची मध्यशिरच शिल्लक राहिली. त्यामुळे शेतामध्ये ऊस पाने विरहीत उभे असल्याचे
दिसून आले. मोठ्या उसाच्या कांड्यांना गारांचा तडाखा बसल्यामुळे त्या पिचलेल्या व इजा झालेल्या अवस्थेत
आढळल्या. काही ठिकाणी उसाच्या कांडीमधील भाग लाल झाल्याचे दिसून आले. जास्तीच्या गारपीटग्रस्त
भागामध्ये उसाच्या वाढ्यावर मार लागल्यामुळे उसाचे पोंगे आतील बाजूने कुजलेल्या अवस्थेत आढळले. अनेक
ठिकाणी वादळी वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे ऊस मोठ्या प्रमाणात लोळलेला आढळला. वेगवेगळ्या लागण
हंगामानुसार ऊस पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून आले आहे. लहान ऊस (सुरू हंगाम
लागवड) व खोडवा सुद्धा या गारपिटीच्या तडाख्यात सापडल्यामुळे अश्या पिकाचे देखील मोठे नुकसान झाल्याचे
निदर्शनास आले. लहान उसांची पाने शिल्लक राहिली नाहीत; उसांना कांड्या आलेल्या नसल्यामुळे फक्त
उसाचे पोंगे जिवंत असल्याचे निदर्शनास आले , परंतू मोठ्या प्रमाणावर ऊस पिकाची हानी झाल्याने उसाच्या
वाढीवर मोठा परिणाम होणार आहे.

उसाला पाने शिल्लक नसल्यामुळे उसाची वाढ होण्यासाठी व संभाव्य नुकसान कमी करण्यासाठी
लवकरात लवकर उपाय करणे गरजेचे आहे.

हंगामनिहाय लागण आणि खोडवा गारपिटग्रस्त पिकाबाबत निरिक्षणे :
१. आडसाली हंगामात (२०१९-२०२०) लागण झालेल्या उसाचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झालेले आहे.
या उसाचे वय ९ ते १० महिन्याचे असून १५ ते २० कांड्या तयार झालेल्या आहेत. गारपिटीमुळे
उसाच्या वाढ्याकडील कांड्या पिचलेल्या तसेच इजा झालेल्या आहेत. पिचलेल्या उचाचे पोगे कुजलेले
आहेत आणि डोळे फुगलेले दिसतात. येत्या ७-८ दिवसात इजा झालेल्या उसाची पाने वाळण्यापूवी
उसाचे पोगे कुजण्याची प्रक्रिया सुरू झालेली दिसेल.

२. सुरू हंगामात लागण केलेल्या उसाच्या आणि खोडवा पिकाच्या पानांच्या चिंधड्या झालेल्या आहेत; परंतू

या उसाचे पोगे जिवंत आहेत. तसेच हा ऊस कमी प्रमाणात लोळलेला आहे.

३. पूर्वहंगामी ऊस पिकाच्या पानांच्यासुद्धा चिंधड्या झाल्या असून उसास कांड्या आलेल्या नसल्यामुळे
नुकसानीचे प्रमाण कमी असून या उसाचे पोगे जिवंत आहेत.

– वरील पूर्वहंगामी , सुरू व खोडवा पिकाचे नुकसान झाले असले तरी पिकाचे पोगे जिवंत
असल्यामुळे उसाची पूर्ण वाढ होणे शक्य आहे. लहान उसात पानांच्या चिंधड्या जरी झाल्या
असल्या तरी सध्या सुरक्षित असलेले फुटवे आणि नंतर येणारे फुटवे लक्षात घेता उपाययोजना
करून नुकसान टाळणे शक्य आहे.

उपाययोजना :
गारपिटग्रस्त ऊस पिकाचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी खालीलप्रमाणे व्यवस्थापन करावे.

१. नवीन सुरू व खोडवा पिकाचे नुकसान जरी झाले असले तरी पिकाची कापणी करू नये. थोड्याफर
प्रमाणात उसास इजा झाल्यामुळे ऊस पिकाचे पुढील नुकसान टाळण्यासाठी बुरशीनाशकाची (१ ग्रॅम
कार्बेंडेझिम किंवा १ ग्रॅम कॉपर आक्झिक्लोराइड १ लिटर पाण्यातून स्टिकरसह) फवारणी करावी. या
पिकास नेहमीच्या खतमात्रेबरोबर एकरी ५० किलो जादा नत्राची मात्रा द्यावी. नवीन पाने आल्यावर
द्रवरूप मुख्य आणि सुक्ष्मअन्नद्रव्याची फवारणी करावी. पुढील कालावधीत तापमानात होणारी वाढ
लक्षात घेता या पिकात खोडकिडीचे प्रमाण वाढणार आहे. खोड किडीचे नियंत्रण करण्यासाठी एकरी १०
किलो फिप्रोनिल ०.३ % (उदा.रिजेंट) किंवा ६ किलो कारटॅप हायड्रोक्लोराइड ०.४ % (उदा.
केल्डान) किंवा १७५ मिली क्लोरँट्रोनिलीप्रोल १८.५ % (उदा. कोराजेन) या किटकनाशकाचा वापर
करावा.

२. पूर्वहंगामी पिकाचे नुकसान सुरू/खोडवा पिकापेक्षा जास्त असले तरी पोंगा कुजलेला नाही; अशा
पिकास नेहमीच्या खतमात्रा शिफारशीप्रमाणे द्याव्यात. तसेच एकरी ५० कि. जादा नत्र द्यावे. नवीन
पाने बाहेर पडल्यानंतर पिकांवर द्रवरूप मुख्य व सुक्ष्मअन्नद्रव्यांची फवारणी करावी.

३. आडसाली हंगामातील पिकांचे नुकसान सर्वात जास्त असून कारखान्याच्या माध्यमातून अशा पिकाची
पाहणी करून घ्यावी; आणि ज्या ठिकाणी उसाचे पोंगे जास्त कुजलेले आहेत त्या पिकाची जमिनीलगत
तोडणी करणे आवश्यक आहे. सर्वच ठिकाणी पोगे जिवंत असल्यास पिकाची कापणी करण्याची गरज
नाही. गारपीटग्रस्त उसाची तोडणी झाल्यानंतर खोडवा पिकाची ज्या पद्धतीने जोपासना केली जाते
त्याप्रमाणे उपाय योजना कराव्यात.

४. गारपीटग्रस्त उसाची पाने सडल्यामुळे आणि पोगे कुजल्याने बुरशीजन्य रोगांचा तसेच किडींचा उपद्रव
होण्याची शक्यता लक्षात घेवून साखर कारखान्याने शेती खात्यातील कर्मच्याऱ्याकडून कारखाना
कार्यक्षेत्रातील गारपीटग्रस्त ऊस पिकाची पाहणी वरचेवर करावी. एखाद्या रोगाची अथवा किडीची लागण
झाली असेल तर त्याकरिता उपाययोजना कराव्यात.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here