भारतातील साखर उत्पादनाचा जागतिक बाजारावर परिणाम

 

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

नवी दिल्ली : चीनी मंडी

भारतात साखर उद्योगाला देण्यात येत असलेल्या अनुदानामुळे जागतिक बाजारपेठेत साखरेचा अतिरिक्त पुरवठा होत आहे. पुढच्या काळातही पुरवठ्यावर याचा परिणाम होतच राहणार आहे, असे मत एका आंतरराष्ट्रीय साखर परिषदेमध्ये व्यापारी आणि विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.

भारतातील साखरेचे अनुदान ८०० कोटी डॉलरपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांनी भारतीय बाजारपेठेच्या मागणीपेक्षाही जास्त ऊस उत्पादन घ्यायला सुरुवात केली आहे, असे मत बाजारपेठेचे विश्लेषक बेन फेस्सलर यांनी व्यक्त केले आहे. भारतात जवळपास ५०० लाख ऊस उत्पादक शेतकरी आहेत. ही संख्या एक व्होटबँक म्हणून पाहिली जाते. आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या तोंडावर एवढ्या मोठ्या मतदार वर्गाला दुखवाण्याचे धाडस कोणी करणार नाही. भारतात २०१७-१८मध्ये साखर उत्पादन २०० लाख टनांवरून थेट ३४० लाख टनापर्यंत वाढले. तेव्हापासून अतिरिक्त साखर पुरवठ्याचा विषय सुरू झाला, असे मत फेस्सलर यांनी व्यक्त केले. फेस्सलर यांच्या म्हणण्यानुसार भारतात पुढच्या हंगामातही जवळपास ३०० लाख टन साखर उत्पादन होईल, अर्थात हवामान आणि राजकीय परिस्थितीवर बरेच काही अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय बाजाराची गरज २६० लाख टन आहे. त्यामुळे हे उत्पादन गरजेपेक्षा जास्त असणारच आहे.

भारताने साखर निर्यात करण्याची गरज आहे. पण, अनेक उपाय योजना करूनही भारताला ५० लाख टन साखर निर्यातीचे टार्गेट पूर्ण करता येणार नाही. मुळात भारतात साखर उत्पादनासाठी जास्त किंमत मोजावी लागते. त्यातच आता देशांतर्गत बाजारातील विक्री दर वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे सध्याच्या घसरलेल्या दरांमद्ये कोणत्याही परिस्थितीत भारताला नुकसान घेऊनच साखर निर्यात करावी लागणार आहे, असे मत फेस्सलर यांनी व्यक्त केले.

भारतात शेतकऱ्यांना उसाचे पैसे लगेच मिळत नाहीत. तरी यामुळे उसाचे क्षेत्र कमी होईल, असे वाटत नाही. सरकार उसाचा दर ठरवत असल्याने शेतकरी ऊस लागवड करतच राहणार, असे मत अल्वेन समूहाचे विभागीय व्यवस्थापक रॉबर्ट हुफ्फ यांनी व्यक्त केले आहे. ऊस उत्पादकांनीच लावण कमी केली म्हणून, उसाचे उत्पादन कमी होणार नाही. भारतात केवळ हवामान म्हणजेच पुरेसा पाऊस झाला नाही तरच, उसाचे क्षेत्र कमी होऊ शकते, असेही हुफ्फ यांनी स्पष्ट केले.

फेस्सलर यांच्या म्हणण्यानुसार जागतिक बाजारात १८० लाख टन अतिरिक्त साखर होती. यावर्षी त्यात ५० लाख टनांची घसरण होईल आणि पुढच्या हंगामात ६० लाख टन साखरेच तुटवडा जाणवणार आहे. थायलंडमध्ये साखरेचे उत्पादन कमी होऊ लागले आहे. गेल्या हंगामात १४५ लाख टन साखर उत्पादन झाले होते. त्यात यंदा घट होऊन ते १४० लाखांच्या आसपासच राहील. तर, पुढच्या हंगामात साखर उत्पादन १२० लाख टनांपर्यंत खाली येईल.

जगातील सर्वांत मोठा ऊस आणि साखर उत्पादक देश असलेल्या ब्राझीलमध्येही या हंगामात साखर उत्पादन घटले आहे, असे मत लेटिसिया फिलिप यांनी व्यक्त केले आहे. ब्राझीलमध्ये साखरेऐवजी इथेनॉलच्या उत्पादनावर भर देण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदाच ब्राझीलची साखर निर्यात घटल्याचेही त्यांनी सांगितले.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here