नवी दिल्ली : इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA)ने ICAR- भारतीय ऊस संशोधन संस्था (IISR, लखनौ) च्या सहकार्याने ICAR-IISR च्या परिसरात ‘ऊस शेतीमधील यांत्रिकीकरण’ या विषयावर एका परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत केंद्र आणि राज्य सरकारमधील अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये कृषी उत्पादन खर्च आणि मूल्य आयोगाचे (CACP) अध्यक्ष प्रोफेसर विजय पॉल शर्मा, उत्तर प्रदेश ऊस विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि आयुक्त संजय भूसरेड्डी आणि केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे अतिरिक्त सचिव सुबोध सिंह यांच्यासह इतर प्रतिनिधींनी उपस्थिती लावली. युपीसीएसआर – शाहजहांपूरचे प्रतिनिधी, साखर उद्योगातील तज्ज्ञ, तंत्रज्ञान निर्माते, शेतकरी आणि देशभरातील साखर कारखानदारांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
साखर उद्योगातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, यांत्रिकीकरणामुळे ऊस शेतीमध्ये एक नव्या युगाची सुरुवात होईल. कामगारांची कमतरता आणि त्यांच्या उच्च दरामुळे ऊस पिकासाठी यांत्रिकीकरणाची गरज आहे. सद्यस्थितीत देशभरात जवळपास २,००० हार्वेस्टर सुरू आहेत. या हार्वेस्टरकडून एकूण उसाच्या जवळपास ४ टक्क्यांची तोडणी केली जाते. ब्राझील, थालयंड आणि अमेरिकेसारख्या इतर ऊस उत्पादक देशांतील तुलनेत हे प्रमाण अतिशय किरकोळ आहे. यांत्रिकी तोडणीचा प्रचार शेतकरी आणि कारखानदार या दोन्ही घटकांसाठी फायदेशीर ठरेल कारण, यातून सर्वात आधी कामगारांची समस्या सोडविता येणे शक्य आहे. यावेळी या तंत्रज्ञान प्रदात्यांनीही आपापल्या उत्पादनांचे प्रदर्शन केले आणि तंत्रज्ञानाच्या विकासाबाबत माहिती दिली.