पुढील हंगामात कर्नाल, पानीपत नवे साखर कारखाने सुरू

चंडीगड : परिसरातील ऊस उत्पादकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्नाल आणि पानीपत हे दोन साखर कारखाने पुढील हंगामात एप्रिल महिन्यात सुरू होणार आहेत. यासाठी जवळपास ६५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. दोन्ही कारखान्यांची निर्मिती आणि यंत्रसामुग्री स्थापन करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
याबाबत शुगरफेडच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या हंगामाच्या अंतिम टप्प्यात, एप्रिल अखेरीपर्यंत या दोन्ही कारखान्यांची गाळप चाचणी घेण्यात येणार आहे. काही तांत्रिक अडचणी असल्या तर त्या दूर करण्यात येणार आहेत. या दोन्ही साखर कारखान्यांचा फायदा परिसरातील लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे. दोन्ही कारखान्यांमध्ये क्षमता वाढविण्यासह येथील मशिन्सही आधुनिक आहेत.

कर्नालमध्ये मेरठ रोडवरील साखर कारखान्यासाठी २६३ कोटी रुपयांची गुंतवणूक करून नव्या साखर कारखान्याची निर्मिती करण्यात आली आहे. येथील आधुनिक मशीनरीची क्षमता दररोज ३५०० टन गाळपाची आहे. येथे ५००० टन गाळप क्षमता करण्यात आली आहे. जुन्या मिलची गाळप क्षमता १८०० टन प्रतिदिन आहे. येथील टर्बाइनचे जनरेटरही लावण्यात आले आहेत, त्यातून १८ मेगावॅट वीज निर्मिती केली जाणार आहे. यातून सहकारी साखर कारखान्याची गरज पूर्ण होऊन वीज महामंडळाला त्याचा पुरवठाही होईल. दुसरीकडे शाहाबाद येथील साखर कारखान्यात ९९ कोटी रुपये खर्चून इथेनॉल प्लान्ट तयार करण्यात आला आहे. येथेही लवकर काम सुरू होईल.

पानीपत साखर कारखान्यासाठी सुमारे ३०६ कोटी रुपये खर्च आला आहे. येथील डिस्टिलरी शिफ्टींगचा खर्च सुमारे ७८ कोटींचा आहे. त्यामुळे येथे एकूण प्लान्टच्या शिफ्टींगवर ४०० कोटी रुपये खर्च होणार आहेत. येथील कामही पूर्णत्वास आले आहे. हा पहिला प्रदूषणमुक्त साखर कारखाना आहे. एप्रिलपासून जुना कारखाना बंद होत असल्याने शहरवासियांना मोठा दिलासा मिळणार आहे. एप्रिल महिन्यात नव्या कारखान्यात चाचणी घेण्यात येणार आहे. पहिल्यांदा कारखान्याची क्षमता ३० लाख क्विंटल गाळपाची होती, तर नव्या कारखान्याची क्षमता ७५ लाख क्विंटलची आहे.
दोन्ही साखर कारखाने सुरू व्हावेत यासाठी भारतीय किसान युनीयनसह अन्य शेतकरी संघटनांनी अनेकवेळा आंदोलने केली आहेत. हे दोन्ही कारखाने जवळपास ३० ते ३५ वर्षे जुने आहेत. शेतकऱ्यांना अनेकदा गाळप बंद पडत असल्याने अडचणींना सामोरे जावे लागत होते. आता त्याचे नूतनीकरण करण्यात आल्याने शेतकऱ्यांना ऊस घेऊन इतरत्र गाळपास जावे लागणार नाही. नव्या यंत्रसामुग्रीमुळे साखरेची रिकव्हरी वाढणार असल्याने कारखान्याचा तोटाही कमी होईल. उसाच्या चिपाडापासून वीज तयार करण्यात येत असल्याने वीजखर्चही कमी होणार आहे.

पुढील हंगामापासून गाळप
पानीपत आणि कर्नाल येथे नवे साखर कारखाने निर्मितीचे काम अंतिम टप्प्यत आहे. या हंगामाच्या अखेरीस दोन्हीकडे चाचणी घेण्याचे आमचे प्रयत्न आहेत. काही अडचणी आल्यास त्या नव्या हंगामापूर्वी दूर करता येईल. पुढील हंगामात दोन्ही कारखाने सुरू होतील आणि त्याचा लाभ परिसरातील शेतकऱ्यांना मिळेल.
– कॅप्टन शक्ती सिंह, कार्यकारी संचालक, शुगरफेड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here