गोरखपूर : देवरियात नवीन साखर कारखाना उभारण्यात येईल, अशी घोषणा करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील साखर कारखान्यांची विक्री करणाऱ्या यापूर्वीच्या समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या सरकारला जोरदार फटकारले आहे. देवरियातील बहियारी बघेत येथील रघुराज इंटर कॉलेजमध्ये २०० कोटी ९२ लाख रुपयांच्या ४१२ विकास योजनांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. यावेळी योगी आदित्यनाथ म्हणाले, देवरियात साखर कारखाना स्थापन करण्यासाठी जमिनीचा शोध घेण्यास सांगण्यात आले आहे.
आधीच्या सरकारांवर टीकास्त्र सोडताना ते म्हणाले, सपा, बसपाच्या सरकारने साखर कारखान्यांची विक्री केली. आणि भाजप सरकार नवे कारखाने सुरू करीत आहेत. पूर्वी देवरियालाही साखरेचे कोठार म्हटले जात होते. मात्र, आधीच्या सरकारांनी लक्ष दिले नाही. साखर कारखाने विकून शेतकरी आणि युवकांच्या रोजगाराच्या संधी हिरावून घेण्यात आल्या. २०१७ पूर्वी रेशन माफिया धान्य हडप करीत होते. मात्र, आता ते कोणत्याही अडथळ्यांशिवाय गरीबांपर्यंत पोहोचते. अंत्योदय कार्डधारकांना होळीपर्यंत मोफत रेशन देण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येकी एक किलो डाळ, तेल, साखर, मिठ यांसह गहू आणि तांदूळ याचा समावेश आहे. नियमित कार्डधारकांना प्रत्येकी एक किलो डाळ, तेल आणि मिठ देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.