भुवनेश्वर : बोलनगीर जिल्ह्यातील विजयानंद सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याची मागणी कारखान्याचे माजी पदाधिकारी आणि इतर नेत्यांनी केली. साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी जादव भवनमध्ये आयोजित एका बैठकीत विविध वक्त्यांनी आपल्या भावना मांडल्या.
विजायनंद साखर कारखाना राज्यातील एकमेव कृषी आधारित उद्योग आहे. तो जाणूनबुजून बंद करण्यात आल्याचा आरोप अनेक वक्त्यांनी केला. कारखाना बंद पडल्याने पाच जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे. सरकारने कारखाना त्वरीत सुरू करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
Orissapost.com मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, ओडिशा राज्य सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आणि कारखान्याचे माजी अध्यक्ष जगनेश्वर बाबू यांनी साखर कारखान्याबाबत विविध प्रस्ताव सादर केले. ते म्हणाले, कारखाना बंद अवस्थेत असला तरी तो कधीही सुरू करता येईल अशा चांगल्या स्थितीत आहे. जेव्हा कारखाना सुरू होता आणि तो चांगल्या पद्धतीने कार्यरत होता, तेव्हा तो बंद केला गेला. साखर कारखाना २०१४ पासून बंद पडला आहे. त्याच्यावर ९७ कोटी रुपयांचे कर्ज होते. त्यातील जवळपास ७० कोटी रुपये देण्यात आले आहेत. उर्वरीत कर्जाची परतफेड करता येणे शक्य असताना कारखाना अचानक बंद करण्यात आला. ओडिशा कृषी भित्तीका शिल्पा आंदोलनचे अध्यक्ष बिपिन कुशुलिया यांनी सांगितले की, हे प्रकरण आता न्यायालयाच्या स्तरावर आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि कर्ज देणाऱ्या बँकांनी एकत्र येऊन चर्चा केली पाहिजे. कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी तोडगा काढायला हवा.