कोल्हापूर : राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्जफेड करूनही कर्जमाफी मिळालेली नाही.अशा सर्वच शेतकऱ्यांना एक लाख रूपये मदत दयावी,अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व करवीरचे आमदार पी.एन.पाटील सडोलीकर यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात केली.
तसेच कर्जमाफी दिल्याबद्दल राज्य शासनाचे अभिनंदन केले. अतिरिक्त साखर उत्पादनामुळे साखर कारखाने आर्थिक अडचणीत आले आहेत. ऊस बिले वेळेत देण्यासाठी बँकाकडून आगाऊ कर्ज उचलावे लागते. त्यामुळे आगामी हंगामात कारखाने सुरु करताना अडचणी येणार आहेत. कारखाने वाचवण्यासाठी राज्य शासनाने मदत दयावी.तसेच साखरेचा विक्री दर वाढवून द्यावा अशी मागणीही आ.पाटील यांनी केली.
राज्यातील सुतगिरण्याही आर्थिक संकटात आहेत. टफ योजनेचा लाभ फक्त नव्या सुतगिरण्यानाच होतो. मात्र हा लाभ जून्या सुतगिरण्यानाही द्यावा तसेच, धामणी प्रकल्प दिर्घकाळ रखडल्यामुळे धामणी खोऱ्यात दरवर्षी तीव्र पाणीटंचाई निर्माण होते.त्यामुळे या प्रकल्पातील तांत्रिक अडचणी दूर करून या प्रकल्पाला भरीव निधी द्यावा व तातडीने प्रकल्प पूर्ण करावा, ही मागणी करुन ते म्हणाले, राज्यात बचत गट चळवळीने सर्वसामान्यांना आधार दिला आहे. मात्र बँकांचे व्याज थकल्यामुळे बचत गट अडचणीत आले आहेत. त्यामुळे या गटांना पूर्ण व्याज माफ करावे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.