कोल्हापूर : छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे १०० व ५० रुपयाचा दुसरा हप्ता देण्याची राज्य सरकार व साखर कारखानदार यांना सद्बुद्धी मिळावी, शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावे यासाठी शाहू महाराजांचे जनकस्थळ कागल ते समाधीस्थळ कोल्हापूरपर्यंत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करून काढण्यात आलेल्या कैफियत पदयात्रेला हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.
‘चीनी मंडी’शी बोलताना राजू शेट्टी म्हणाले कि, हजारो शेतकऱ्यांच्या न्याय मागणीसाठी ही पदयात्रा काढण्यात येत आहे. सरकार आणि साखर कारखानदार यांनी दिलेला शब्द पाळलेला नाही, त्यामुळे आम्हाला पुन्हा रस्त्यावरची लढाई लढावी लागत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम मिळवून दिल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. ते म्हणाले, काही मंत्री शक्तिपीठ महामार्गाचे भूसंपादन स्थगित केले असल्याचे सांगत आहेत. तसा कोणताही आदेश प्रशासनाकडे आलेला नाही. हा महामार्ग स्थगित नको, रद्दच करावा, ही आमची भूमिका ठाम असल्याचेही शेट्टी म्हणाले. यावेळी डॉ. जालिंदर पाटील, वैभव कांबळे, सावकार मादनाईक यांच्यासह नेते, कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.