कोल्हापूर :बिद्री साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर कामगारांनी मंगळवारी सभा घेऊन डिस्टिलरी प्रकल्पावर राज्य सरकारने केलेल्या कारवाईचा निषेध केला.कामगारांनी दिवसभर निषेधार्थ काळ्या फिती लावून काम केले. कारवाई मागे न घेतल्यास प्रसंगी उपोषणास बसण्याची तयारी असल्याचे कामगारांनी सांगितले.
याबाबत कामगार संचालक शिवाजी केसरकर म्हणाले की, कोणी सूडबुध्दीने चांगल्या प्रकल्पावर चुकीची कारवाई करीत असेल तर कामगार गप्प बसणार नाहीत.राजकीय पोळी भाजण्यासाठी ही कारवाई केली आहे.मौनीनगर कामगार पतसंस्थेचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण फराकटे म्हणाले की, कारखान्याचे अध्यक्ष के.पी.पाटील यांना अडचणीत आणण्याच्या दृष्टीने कारवाई करणे चुकीचे आहे.कामगारांच्यावतीने तीव्र लढा उभारला जाईल.यावेळी अजित आबिटकर, अशोक फराकटे आदींची भाषणे झाली. कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.