पुणे : सोलापूर जिल्ह्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याने चालू वर्षातील ऊसबिल दिले नसल्यामुळे सभासद, शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांकडून भीक मांगो आंदोलन करण्यात येत आहे.कारखान्यांचा गळीत हंगाम संपून पाच महिने झाले आहेत. आता दुसऱ्या हंगामाची तयारी सुरु होण्याच्या मार्गावर आहे. परंतु साखर कारखानदारांकडून शेतकऱ्यांना थकीत ऊस बिले देण्यात आलेली नाहीत.
साखर आयुक्तांकडे पाठपुरावा करूनही ऊस बिल मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोट्यवधी रुपयांची थकबाकी असून जोपर्यंत थकबाकी देत नाही तोपर्यंत आंदोलन करणार, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. थकीत बिले देण्यासाठी जनशक्ती शेतकरी संघटनेने साखर आयुक्त व राज्य सरकारला 5 सप्टेंबरचा अल्टिमेटम दिला होता. त्यानुसार जनशक्ती संघटनेने साखर संकुलाच्या गेटमध्ये घुसून आंदोलन केले आहे. यावेळी शेतकरी नेते अतुल खूपसे बाळासाहेब सानप व शेतकरी उपस्थित होते.