गुरदासपूर : पंजाबसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या बहुप्रतिक्षीत ऊस संशोशन संस्थेच्या निर्मितीचे काम गतीने सुरू झाले आहे. राज्यातील बेरोजगार युवकांच्या दृष्टीने आशेचा किरण ठरणाऱ्या आणि शेतकऱ्यांना चांगल्या प्रजातीचे बि-बियाणे निवडण्यासाठी पर्याय ठरू शकणाऱ्या या ४५ कोटी रुपये खर्चाच्या संस्थेची उभारणी केली जात आहे. सहकार मंत्री, सुखजिंदर सिंह रंधावा यांनी ही संस्था निर्मितीचे उद्दीष्ट ठेवले आहे.
नव्या संस्थेला गुरु नानक देव ऊस संशोधन आणि विकास संस्था (GNDSRDI) असे नाव देण्यात आले आहे. आणि या संस्थेला पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) धर्तीवर बनविण्यात येत आहे. रंधावा हे या संस्थेचे अध्यक्ष राहतील तर अधिकारी पुनीत गोयल हे संस्थेचे सदस्य सचिव असतील. अजनाला साखर कारखान्याचे ऊस विशेषज्ञ तथा महा व्यवस्थापक शिवराज पाल सिंह धालीवाल यांना संस्थेचे संचालक नियुक्त करण्यात आले आहे.
पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत या सस्थेची उभारणी पूर्ण झाल्यानंतर सीमेवर असलेल्या या जिल्ह्यातील युवकांना रोजगार मिळू शकेल. येथे ४० बाय १५ फूट हॉलची निर्मिती करण्यात आली असून १५ एकर शेती करण्यात आली आहे. एक एकर क्षेत्रात प्रयोगशाळा असेल. याशिवाय विविध विभाग, कार्यालयासह मार्गदर्शन केद्राची उभारणी केली जात आहे. उर्वरीत ९९ एकर जागेचा उपयोग संशोधनासाठी केला जाईल. पुढील टप्प्यात साखर उत्पादन अभ्यासक्रम, शुगर इंजिनीअरिंग डिप्लोमा, शुगर इक्विंपमेंट असे अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. वीस ऊस संशोधक आणि कर्मचाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे.