कोल्हापूर : जिल्ह्यात जवळपास दोन आठवड्यांनंतर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेले काही दिवस पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत होते. भारतीय हवामान विभागाने आगामी चार दिवस, १० ते १३ जुलै या कालावधीत जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कृषी विभागाने गुरुवारी आणि शुक्रवारी केलेल्या नोंदीनुसार कोल्हापूर जिल्ह्यात ६.६ मिमी पाऊस झाला. त्यामध्ये गगनबावडामध्ये सर्वाधिक २२.२ मिमी पाऊस झाला. त्यापाठोपाठ करवीरमध्ये १२.१ मिमी आणि पन्हाळ्यात १०.९ मिमी पावसाची नोंद झाली. गडहिंग्लजमध्ये सर्वात कमी ०.६ मिमी पाऊस झाला आहे.
शेतकऱ्यांनी सांगितले की, आम्ही भात आणि सोयाबीनची पेरणी केली आहे. आता आम्हाला पावसाची प्रतीक्षा आहे. पाऊस नसेल तर आमची आताची पेरणी वाया जाऊ शकते आणि पुन्हा सर्व तयारी करावी लागते. पाऊस जर सुरू झाला तर आम्हाला विहिर अथवा पाईपलाईनमधून पाणी द्यावे लागणार नाही. पाऊस आणखी काही दिवस सुरू राहील अशी अपेक्षा आहे.
आयएमडी मुंबईच्या उप संचालक शुभांगी भुटे यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की, मान्सून पु्न्हा सक्रीय झाला आहे. त्यामुळे आगामी चार ते पाच दिवस चांगला पाऊस महाराष्ट्रात दिसू शकतो. जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात पोहोचला होता. चांगल्या पावसानंतर त्यात खंड पडला होता. आणि राज्याच्या काही भागात किरकोळ पाऊस झाला होता.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link