पुन्हा येणार पाऊस; सतर्कतेचे आदेश

नाशिक : अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे जिल्ह्यात काही भागात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे. जिल्ह्यात काही दिवसांपासून अवकाळी पावसाने मुक्काम ठोकला आहे. यामुळे पिके नष्ट झाल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता पुन्हा 6 ते 8 नोव्हेंबर या काळात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

उत्तर महाराष्ट्रात नाशिकसह जळगाव, धुळे जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रहिवाशांनी सतर्क रहावे, असे आवाहन मांढरे यांनी केले आहे. शेतकर्‍यांनी शेतमाल सुरक्षित स्थळी ठेवावा. पावसामुळे शेतमाल खराब होऊ नये, यासाठी सुरक्षित ठिकाणी त्याची साठवणूक करावी. वादळामुळे शेड, पत्रे, कमकुवत घरे, झाडे, गुरांचे गोठे, पशुपालन शेडसह शाळांचे पत्रे, घरांचे पत्रे, कांदा चाळ पत्रे उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अतिवृष्टी झाल्यास धरणांतून पाण्याचा विसर्ग तात्काळ करावा लागेल. अशावेळी नदीकाठच्या रहिवाशांनी सुरक्षितस्थळी आश्रय घ्यावा. नागरिकांनी नदी, नाले, ओढा यामध्ये प्रवेश करू नये तसेच पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये, वीज खांबापासून दूर रहावे. जनावरांना नदीपत्रापासून सुरक्षित ठिकाणी हलवावे, वाहत्या पाण्यामध्ये कोणीही पोहण्याचा प्रयत्न करू नये, कुठल्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये, धोकादायक क्षेत्रात सेल्फी काढू नये, गोदावरीला पूर आल्यास पंचवटी, रामकुंड क्षेत्रातील भाविकांची वाहने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावी, विजांचा आवाज होत असल्यास घराबाहेर पडू नये, पर्यटन स्थळी जातांना हवामानाचा अंदाज घ्यावा, असे आवाहन मांढरे यांनी केले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here