नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मध्य, दक्षिण आणि पूर्वोत्तर भारतासह देशाच्या अनेक भागात २६ ते ३० एप्रिल या कालावधीत हवामान आर्द्र राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. तेलंगणा, केरळ आणि पुद्दुचेरीच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह ३० ते ४० किलोमीटर प्रती तास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.
आयएमडीच्या अनुमानानुसार पश्चिम बंगालमधील गांगेय मैदान, अंदमान-निकोबार द्वीपसमूह, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, रायलसीमा, दक्षिण कर्नाटक, तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराइकल अशा काही ठिकाणांवर विजांच्या चमकल्याचे सांगण्यात आले. गुजरात आणि ओडिसाच्या किनारपट्टीच्या भागात उष्णतेची लाट राहू शकेल अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार २७ एप्रिल रोजी उत्तराखंड, आसाम, मेघालय, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तेलंगणा, केरळच्या काही विभागांत मेघगर्जनेसह विजा चमकतील आणि वादळी वारे वाहतील. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, २८ एप्रिल रोजी दक्षिण कर्नाटक आणि उत्तर केरळच्या काही भागात पावसाची शक्यता आहे.
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, ३० एप्रिल रोजी उत्तराखंड, विदर्भ, छत्तीसगढ, पश्चिम बंगाल, सिक्किम, ओडिसा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीचा भाग, तेलंगणा, केरळमध्ये मेघगर्जनेसह विजा चमकून वादळी वारे वाहतील. यांदरम्यान, दक्षिण कर्नाटक, केरळच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.