देशातील अनेक राज्यांत पावसाने हाहाकार, महाराष्ट्रात १०४ जणांचे मृत्यू

नवी दिल्ली : सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे महाराष्ट्र, गुजरात, केरळ, आंध्र प्रदेश, राजस्थानसह देशातील विविध भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाराष्ट्रात एक जूनपासून आतापर्यंत १०४ जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये जोरदार पावसाने सहा धरणांचा जलस्तर वाढला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राजस्थानमध्ये अनेक भागात जोरदार पावसासह काही जिल्ह्यांत पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालात म्हटले आहे की, एक जूनपासून १६ जुलैअखेर राज्यात १०४ लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात दोघांचा मृत्यू झाला. वीज कोसळणे, भूस्खलन, झाडे कोसळून हे मृत्यू झाले आहेत.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, केरळच्या काही भागात जोरदार पाऊस सुरू आहे. राज्यातील मुल्लापेरियार आणि इडुक्कीसह अनेक धरणांतील पाणीसाठा त्यांच्या क्षमतेपर्यंत पोहोचला आहे. केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माहितीनुसार सहा धरणांचे पाणी रेड अलर्ट स्तरावर आहे. तर एका धरणाचा पाणीसाठा ऑरेंज अलर्टवर आहे. सहापैकी चार धरणे इडूक्कीमध्ये आहेत. गुजरातमध्ये अरबी समुद्रात वादळाची सुरुवात झाली आहे. प्रती तास ५० किलोमीटर वेगाने वारे वाहात आहे. हे वादळ ओमानच्या दिशेने पुढे सरकत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी पोरबंदर किनारपट्टीपासून १०० किमीवरील घडामोडींवर लक्ष ठेवले आहे. ओरिसातील पूरस्थिती काहीशी सुधारली आहे. मात्र, अद्याप ९० हजार लोकांना पुराचा फटका बसला आहे. राजस्थान, गुजरातमध्येही स्थिती बिकट आहे. येथे मदतकार्याला गती देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here