चेन्नई : तामिळनाडूत पावसाने कहर केला आहे. गुरुवारी भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांत रेड अॅलर्ट जारी केला आहे. सध्या येथे स्थिती खूप खराब बनली आहे. पावसामुळे राज्यातील ९० प्रमुख धरणे आणि तलाव जवळपास भरले आहेत. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, वैगई धरणाची पाणीपातळी ६९ फुटापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. वैगई धरणाची पाणीसंचय क्षमता ७१ फूट इतकी आहे.
सध्या राज्यात जोरदार पावसाने स्थिती खराब झाली आहे. आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला असून खराब हवामानामुळे समुद्र किनारपट्टीवरील स्थिती बिघडली आहे. राजधानी चेन्नईसह इतर किनारपट्टीच्या परिसरात रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यावर नावेने वाहतूक सुरू आहे. पावसामुळे रेल्वे, विमान वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. नैसर्गिक आपत्तीत खूप जण जखमी झाले आहे. तर पशुधनाची मोठी हानी झाली आहे.
केंद्रीय जल आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, रानीपेट जिल्ह्यातील पोय्यापक्कममध्ये कल्लर नदी आणि तिरुवल्लूर जिल्ह्यातील पुदुवायलमध्ये अरनियार नदी उच्च पातळीवरून वाहात आहे. यादरम्यान, बंगालच्या खाडीवरील चक्रीवादळामुळे या क्षेत्रात सातत्याने पाऊस कोसळत आहे. आता चेन्नई केटी नगरमध्ये भरलेले पाणी काढण्यात येत आहे.