दरभंगा, बिहार: रैयाम आणि सकरी साखर कारखाने पुन्हा सुरू केले जाणार आहेत. नव्या इथेनॉल धोरणानुसार नव्या गुंतवणूकदारांच्या माध्यमातून कारखान्यांमध्ये साखर आणि इथेनॉल प्लांट सुरू केला जाणार आहे. ऊस मंत्री प्रमोद कुमार यांनी ही माहिती दिली. त्यांनी नुकतीच रैयाम साखर कारखान्याची पाहणी केली.
ऊस मंत्री प्रमोद कुमार यांनी रैसाम साखर कारखान्याच्या पुर्नउभारणीचे काम वेळेत पूर्ण न केल्याबद्दल दिल्लीच्या तिरहूत इंडस्ट्रिज लिमिटेडशी असलेला करार रद्दबातल ठरवला आहे. आता सरकारच्या नव्या गुंतवणूक धोरणानुसार नव्या गुंतवणूकदारांच्या माध्यमातून इथेनॉल, साखर प्लांट सुरू केला जाईल. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. या दौऱ्यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना विविध बाबींसंदर्भात सूचना देण्यात आल्या. करार रद्द झाल्यानंतर कारखाना आणि तेथील साहित्याची जबाबदारी रैयाम पोलीस ठाण्याकडे सोपविण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी गंगेश झा आणि रैयामचे पोलीस अधिकारी संजय कुमार सिंह यांनी तेथील साहित्याची यादी बनवली. यासोबतच पोलिसांनी सुरक्षेची जबाबदारी स्वीकारली.
रैयामहून परतल्यानंतर मंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आंबेडकर सभागृहात धार्मिक न्यास मंडळाची बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी न्यासच्या संपत्तीची यादी मिळाल्याचे पत्रकारांना सांगितले. दुसऱ्या यादीसाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे असे ते म्हणाले. न्यासच्या मठ, मंदिर, तलावांचा सर्व्हे करण्यात येत आहे. जर अतिक्रमण आढळल्यास तत्काळ हटवू असे ते म्हणाले. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. त्यागराजन एसएम, बिहार राज्य धार्मिक न्यास मंडळाचे अध्यक्ष अखिलेश प्रसाद जैन, आमदार संजय सरावगी, अलीनगरचे आमदार मिश्रीलाल यादव, बिस्फीचे आमदार हरिभूषण ठाकूर आदी उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link