भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी देशाच्या आर्थिक धोरणाचा आढावा जाहीर केला. चालू आर्थिक वर्षातील या पहिल्या पतधोरण आढावा बैठकीत केंद्रीय बँकेने रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट जैसे थे ठेवले आहेत. रेपो पेट ४ टक्के तर रिव्हर्स रेपो रेट ३.३५ टक्क्यांवर स्थिर आहे. यासोबतच आरबीायने आपल्या पतधोरणाच्या भूमिकेबाबत कोणताही बदल केलेला नाही. आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक बुधवारी सुरू झाली होती.
आजतक डॉट कॉमवर प्रकाशित वृत्तानुसार, पतधोरण समितीने दर जैसे थे ठेवण्यासह चालू आर्थिक वर्षात देशाच्या आर्थिक विकास दराच्या अनुमानात घट केली आहे. पहिल्या तिमाहीत हा १६.२ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ६.२ टक्के, तिसऱ्या तिमाहिती ४.१ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ४ टक्के दर राहिल. तर पूर्ण आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये आर्थिक विकास दर ७.२ टक्के राहिल असे अनुमान आहे. केंद्रीय बँकेने चालूआर्थिक वर्षात महागाई उच्च स्तरावर राहील असे अनुमान जाहीर केले आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये हा दर ५.७ टक्के राहिल असे अनुमान आहे. पहिल्या तिमाहीत ६.३ टक्के, दुसऱ्या तिमाहिती ५ टक्के तर तिसऱ्या तिमाहीत हा दर ५.४ टक्के आणि चौथ्या तिमाहीत हा दर ५.१ टक्के असेल. महागाईचा दर उच्च असला तरी तो रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले. महागाई दर ४ टक्क्यांच्या आसपास राखण्याचे लक्ष्य आहे. यात २ टक्क्यांचा फरक पडू शकतो.