खेड शिवापूर : यंदाच्या अवकाळी पावासामुळे ऊसाची लागवड कमी झाली आहे. त्याचप्रमाणे ऊस पिकाला मोठ्या प्रमाणात तुरे आल्याचे दिसून येत आहे. यंदा गळीत हंगाम उशिरा सुरू झाल्याने उर्वरित ऊसालाही तुरे फुटले आहेत. तुरे आल्यामुळे वजनात घट होत असते. त्यामुळे शेतकर्यांच्या उसाचे टनेज घटल्याने आर्थिक नुकसान होणार आहे.
शेतकर्यांच्या शेतात ऊस उभा असलेला दिसत असला तरी पावासामुळे बहुतांश पीक हातचे गेले आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात ऊसाचे क्षेत्र कमी झाले आहे. जिल्ह्यात सहकारी आणि खासगी असे एकूण 18 साखर कारखाने आहेत. पुणे जिल्ह्यातील पूर्व, उत्तर भागात ऊसाचे दरवर्षी उत्पादन घेतले जाते.
गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत यंदा सरासरी पावसाने जोरदार हजेरी लावली तसेच पावसाळ्यात जोरदार पाऊस पडल्यानंतर परतीच्या पावसाचा मुक्काम संपूर्ण तालुक्यात खूप दिवस राहिला. त्यातच शासनाने यावेळी गळीत हंगाम सुरू करण्यास उशीर लावला होता. गळितासाठी यंदा जाणार्या उसाला 18 महिन्यापेक्षा जास्त कालावधी गेला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात ऊसाला तुरे फुटले आहेत. तुरा फुटल्याने वजनात होणारी घट व ऊसाच्या वाड्याचा वैरणीसाठी वापर होत नाही. त्यामुळे शेतकर्यांच्या ऊसाच्या उत्पादनात घट होतेच, त्याचबरोबर जनावरांच्या वैरणीचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.