पुणे:भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या निवृत्त कामगारांची बैठक झाली.थकीत असलेली जवळपास ४० कोटी रुपयांची देणी मिळणार आहेत की नाहीत आणि हे पैसे मिळवण्यासाठी पुढे काय करावे, या विषयावर या बैठकीत सामूहिक चर्चा झाली.आतापर्यंत चाळीस कामगारांचा मृत्यू झाला आहे, अजून किती मेल्यावर आमची देणी मिळणार आहेत, असा आक्रोश निवृत्तांनी केला.ही देणी आता लवकर दिली गेली नाहीत, काही कामगारांनी आत्मदहन करण्याचा इशारा या बैठकीत दिला.
२०१६ ते २०२४ पर्यंत जवळपास ५०० ते ५५० कामगार भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यातून सेवानिवृत्त झालेले आहेत.सेवानिवृत्तीनंतर त्यांचे थकीत वेतन, फंड आणि आणखी काही देणी मिळालेली नाहीत. ही देणी वसूल करण्यासाठी विविध स्वरूपाची आंदोलने सेवानिवृत्त कर्मचारी करतील, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.भालचंद्र मोरे, शिवाजीराव काळे, सुरेशराव निंबाळकर, शहाजी जाधव, शिवाजी दिवेकर, जयसिंग जांबले आदींनी चर्चेत सहभाग घेतला.पैसे वसूल करण्यासाठी आगामी काळात जी आंदोलने करावी लागतील ती करू, असा एकमताने निर्णय घेण्यात आला.