सांगली : प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांना ओळखपत्र देण्यासह स्थानिक पातळीवर निर्माण होणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याचा निर्णय झाला. जिल्हास्तरीय समितीच्या या बैठकीला समाज कल्याणचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव, प्रणिल गिल्डा यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या एक देश एक रेशनकार्ड या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना बारकूल यांनी यावेळी दिल्या. ऊस तोडणी कामगारांना ओळखपत्र देणे, रेशन कार्ड पोर्टेबिलिटी व अन्नधान्य पुरवठा, आरोग्य शिबिर, जिल्हा महिला बाल कल्याण विभागामार्फत देण्यात येणारा पोषण आहार, मृत ऊस तोडणी कामगारांच्या वारसांना अर्थसहाय्य आदी विषयांचा बैठकीत आढावा घेण्यात आला. संबंधित विभागांना कामगारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक कार्यवाहीच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.