कोल्हापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी जुलै महिन्यात आलेल्या पुराचा फटका बसलेल्या क्षेत्रातील ऊस तोडणीबाबत संबंधीत गावांमध्ये जाऊन कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. खासदार धैर्यशील माने यांच्या आग्रहानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांची बैठक बोलावली होती. कारखानदारांनी नैतिकता दाखवत पूरग्रस्त ऊसाच्या तोडणी व गाळपाला प्राधान्य दिले पाहिजे असे रेखावार यांनी सांगितले. पुरामुळे ६०,००० हेक्टरहून अधिक क्षेत्रातील ऊसाला फटका बसला आहे.
टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, खासदार माने यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की, साखर कारखानदारांनी आमचे म्हणणे मान्य केले आहे. आधी पूरग्रस्त भागातील ऊस तोडणीस ते तयार झाले आहेत. याबाबतचे वेळापत्रक सादर करण्यास सांगण्यात आले आहे. अशा गावांतील ऊस तोडणी, गाळप कधी करणार याचे वेळापत्रक तयार केले जाईल. दरम्यान, काही कारखानदारांनी पूरग्रस्त भागातील रस्ते उद्ध्वस्त झाल्याने तोडणी कामगार तेथेपर्यंत पोहोचू शकत नसल्याबाबत चिंता व्यक्त केली. मशीनरी आणि वाहने शेतापर्यंत नेण्यात अडचणीत आहेत.
वस्तूतः अशा उसाचा साखर उतारा कमी असतो. त्यामुळे साखर कारखानदार पूरग्रस्त भागातील उसाची २० टक्के तर इतर क्षेत्रातील उसाची ८० टक्के तोडणी करतील. पूरग्रस्त ऊस नदीकाठी आहे. अशा ठिकाणी साखर उतारा अधिक असतो. त्यामुळे या उसापासून अधिक साखर उत्पादित होऊ शकते. मात्र, अशा उसामुळे साखरेचे एकूण उत्पादन कमी होईल असा दावा कारखानदारांनी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी बँकांकडून पैसे उभारण्यात अडथळे येतील असा कारखानदारांचा आक्षेप आहे.