देशात गळीत हंगाम सुरू झाला आहे. देशभरात ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसाचा साखर उत्पादनावर परिणाम झाला आहे. देशाचे एकूण साखर उत्पादन मागील हंगामाच्या तुलनेत कमी आहे. मात्र तामिळनाडूमध्ये साखरेचे उत्पादन वाढल्याचे दिसून आले आहे.
नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेडच्या (NFCSFL) म्हणण्यानुसार, तामिळनाडूमध्ये या हंगामात ३१ ऑक्टोबरपर्यंत साखरेचे उत्पादन ४५,००० टन झाले आहे. एका वर्षापूर्वी समान कालावधीत २५,००० टन होते. राज्यात आतापर्यंत १० साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. गेल्या हंगामात या कालावधीपर्यंत ४ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले होते.
दुसरीकडे देशातील साखर हंगाम २०२२-२३ च्या पहिल्या महिन्यात साखरेचे उत्पादन वार्षिक १४.७३ टक्क्यांनी घसरून ४.०५ लाख टन झाले. २०२१-२२ च्या हंगामात ऑक्टोबरमध्ये साखरेचे ४.७५ लाख टन उत्पादन झाले होते. या हंगामात ऑक्टोबरमध्ये सुमारे १३४ कारखाने सुरू आहेत. तर गेल्यावर्षी या कालावधीत १६० कारखाने सुरू होते.