नवी दिल्ली : भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या म्हणण्यानुसार, पुढील तीन ते चार दिवसांत दक्षिण-पश्चिम मान्सून बंगालच्या खाडीतील काही भाग आणि मालदीव तसेच कोरोरिन क्षेत्रातून पुढे सरकण्याची शक्यता आहे. आयएमडीने म्हटले आहे की, एक नवा पश्चिमी चक्रवातही उत्तर पश्चिम भारतामध्ये गुरुवारपर्यंत पसरेल, अशी शक्यता आहे. या स्थितीमुळे गुरुवारी हिमाचल प्रदेशातील संभाव्य गारपिटीसह हलका ते मध्यम पाऊस कोसळेल. जोरदार वारे वाहू शकतात.
उत्तराखंडमध्ये शुक्रवारपर्यंत गारपिटीची शक्यता आहे. हवामान विभागाने आज राजस्थानमध्ये मेघगर्जनेसह हलका आणि जम्मू काश्मीरमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
पुढील २४ तासात दिल्ली, पूर्व दिल्ली, नवी दिल्ली, उत्तर दिल्ली, पूर्वोत्तर दिल्ली, दक्षिण दिल्ली, दक्षिण-पश्चिम दिल्लीतील अनेक भागात जोरदार वाऱ्यासह हलका पाऊस कोसळेल, अशी शक्यता आहे. पंजाब, हरियाणातील अनेक भागात अशीच स्थिती राहू शकेल.
आयएमडीचे पिक सल्लागार युनिट ॲग्रोमेटने हरियाणा, पंजाबमधील शेतकऱ्यांसाठी निर्देश जारी केले आहेत. यामध्ये त्यांना शिफारस केलेल्या कालावधीत वाणांची निवड करून भात पेरणी पूर्ण करण्याचा सल्ला दिला आहे. शिफारस केलेल्या तांदळाच्या जातींमध्ये PR१२१ ते PR१३१ आणि HKR ४७ यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना कापसाच्या शेतात पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तण नष्ट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पुढील चार दिवस आवश्यकतेनुसार आणि हवामानानुसार खते आणि सिंचनाचा वापर करण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला.
भात, कापूस आणि ऊस, खरीप हंगामातील प्राथमिक पिके आहेत. ही शेती पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाबमध्ये केली जाते. खरीप पिकांचा परंपरागत हंगाम जून ते ऑक्टोबरपर्यंत असतो. आणि नेहमी एक जून रोजी केरळमध्ये दक्षिण-पश्चिम मान्सूनच्या सुरुवातीने पहिल्या पावसासह पिकाची पेरणी केली जाते. पश्चिमी चक्रवातामुळे पुढील पाच दिवसांत केरळ, लक्षद्विपमध्ये गडगडाटी, वीज आणि जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस कोसळू शकतो. आयएमडीने रविवारपर्यंत तामिळनाडू आणि कर्नाटकच्या काही भागात जादा पावसाची शक्यता वर्तवली आहे.