पूर्णा (जि. परभणी): कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी शासन विविध उपाययोजना करत आहे. त्याचा एक भाग म्हणून देशात लॉकडाऊन सुरू आहे. या परिस्थितीत ‘हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत बळिराजा साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव जाधव यांनी गोरगरिबांना पाच क्विंटल साखर येथील सुमन मंगल कार्यालयात सोमवारी (ता. ३०) वाटपासाठी दिली आहे. या उपक्रमात पूर्णा शहरातील अनेक दानशूर व्यक्तींनी सहभाग घेतला आहे.
आठ दिवसांपासून मजुरीची सर्व कामे ठप्प असल्याने हातावर पोट असलेल्या गरिबांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून ‘हात मदतीचा’ या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून गरजवंतांना धान्य वाटप करण्यास सुरवात केली आहे. दरम्यान, सोमवारी (ता. ३०) पूर्णेतील बळिराजा साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव जाधव, जनरल मॅनेजर अशोक थोरात, संचालक दिनकर जाधव, पुंजाजी बोंडे, प्रल्हाद ठोंबरे, मनोहर केंद्रे यांनी नियोजनस्थळी सुमन मंगल कार्यालय येथे भेट देत कारखान्याच्या वतीने पाच क्विंटल साखर दिली. याबद्दल ‘हात मदतीचा’ या ग्रुपच्या सर्व सदस्यांनी कारखान्याचे आभार व्यक्त केले.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.