बिजनौर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गळीत हंगामासाठीची तयारी पूर्ण केली आहे. दिवाळीदरम्यान कारखाने सुरू व्हावेत यासाठी प्रयत्न सुरू असून या कालावधीतील तारखा ऊस विभागाला देण्यात आल्या आहेत. शेतकरी संघटनांनीही कारखाने लवकरात लवकर सुरू करावेत अशी मागणी केली आहे.
बिजनौर जिल्ह्यासह पश्चिम विभाग हा उत्तर प्रदेशातील उसाचा पट्टा मानला जातो. जिल्ह्यात सव्वादोन लाख हेक्टरवर ऊस पिक आहे. एका शेतकरी सहकारी कारखान्यांसह नऊ कारखान्यांकडून येथील ऊस खरेदी केला जातो.
अमर उजालामधील वृत्तानुसार, जिल्ह्याची अर्थव्यवस्था ऊस पिका भोवतीच आहे. नुरपूरमधील चांगीपूर येथे जिल्ह्यातील दहावा साखर कारखाना स्थापन करण्याची तयारी सुरू आहे. बिंदल ग्रुपने कारखान्यासह डिस्टिलरी सुरू करण्याची परवानगी मागितली आहे. डिस्टीलरी आणि कारखाना उभारणीसाठी पाचशे कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल. हा कारखाना सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना ऊस पुरवठ्यात मदत होईल आणि युवकांनाही रोजगार मिळेल. यंदा धामपूर, स्योहारा हे दोन कारखाने २६ ऑक्टोबर रोजी सुरू होतील. तर बिलाई, बरकातपूर कारखाना २८ ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे. बहादरपूर आणि बुंदकी कारखाना २९ ऑक्टोबर रोजी, तर चांदपूर कारखाना दोन नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहे. बिजनौर कारखाना तीन नोव्हेंबर तर नजीबाबाद कारखाना पाच नोव्हेंबरला सुरू होणार असल्याचे ऊस विभागाने सांगितले.