‘दौलत’ कारखान्याची देणी भागवण्यासाठी काढला मार्ग

चंदगड : प्रतिनिधी

शेतकर्‍यांची थकीत एफआरपी तत्काळ देण्याचा निर्णय घेवून दौलत कारखान्याचा एफआरपीचा तिढा अखेर सोडवण्यात आला. तहसील कार्यालयात तहसीलदार विनोद रणावरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.दौलत कारखाना गोकाकच्या न्यूट्रियन्स कंपनीने चालवण्यासाठी घेतला होता. या कंपनीने कर्जाची रक्कम न भरल्याने बँकेने हा कारखाना अथर्व कंपनीला चालवण्यासाठी दिला. त्यानंतर साखर कारखान्याच्या गोदामात साखर पडून राहिल्यामुळे शेतकर्‍यांची देणी गेल्या तीन वर्षांपासून रखडली होती.

साखर कारखाना प्रशासन आणि जिल्हा बँकेच्या मध्यस्थीने दौलत बचाव कृती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. संतोष मळवीकर यांनी तोडगा काढून शेतकर्‍यांची साडेपाच कोटी थकीत असलेली एफआरपी देण्याचे मान्य केले. थकीत एफआरपी मिळणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

लवकरच गोदामातील शिल्लक साखरेची विक्री केली जाणार आहे. विक्री झालेल्या पैशातून एफआरपी भागवण्यात येणार आहे. साखर विक्री करून जिल्हा बँकेने 3 कोटी 30 लाख जमा करणार असल्याचे सांगितले. तर अथर्व कंपनीच्या कराराप्रमाणे 1 कोटी 85 लाखाची रक्कम शेतकर्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी शेतकर्‍यांची एफआरपी 15 टक्के व्याजासह देण्याचे आदेश दिले आहेत. बैठकीला अ‍ॅड. संतोष मळवीकर, प्रा. एन. एस. पाटील, पं. स. सभापती बबनराव देसाई, शांताराम पाटील, प्रभाकर खांडेकर, कृष्णा रेंगडे, प्रदीप पवार, अनिल होडगे, जिल्हा बँकेचे ए. बी. माने, रणधीर चव्हाण, जावेद फरास, नितीन पाटील आदीं उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here