सहारनपूर : ऊस बिले देण्यास साखर कारखान्यांनी गती द्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी अखिलेश सिंह यांनी दिले आहेत. गांगनौली साखर कारखान्याकडून ऊस बिले देण्यास गती संथ असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. ऊस वाहतुकीच्या वाहनांना रिफ्लेक्टर बसविण्याबाबत त्यांनी सूचना केल्या.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्हाधिकारी सभागृहात झालेल्या बैठकीत ऊस बिलांबाबतचा आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी गांगनौली साखर कारखान्याकडून बिले देण्यास उशीर होत असल्याबाबत तिव्र नाराजी व्यक्त केली. गागलहेडी साखर कारखान्याच्या व्यवस्थापकांनाही ऊस बिलांची थकबाकी देण्यास गती द्या असे आदेश त्यांनी दिले. सरसावा आणि नानौता सहकारी साखर कारखान्यांच्या ऊस बिलांचाही आढावा यावेळी घेण्यात आला. अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
नव्या हंगामात खरेदी केलेल्या ऊसाची बिले लवकरच देण्याची प्रक्रिया सुरू करू असे सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापकांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी ऊस घेवून येणाऱ्या वाहनांवर रिफ्लेक्टर लावण्याचे निर्देश दिले. ऊस घेवून येणाऱ्या शेतकऱ्यांचा थंडीपासून बचाव करण्याबाबत पुरेशी व्यवस्था करण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी ऊस उपायुक्त तथा जिल्हा ऊस अधिकारी डॉ. आर. डी. द्विवेदी, वरिष्ठ ऊस विकास निरीक्षक ए. के. ओझा, डॉ. यशपाल सिंह, ओमवीर सिंह, नीरज कुमार यांच्यासह सर्व साखर कारखान्यांचे अधिकारी उपस्थित होते.