सोलापूर विभागात १०० लाख क्विंटलपर्यंत साखर उत्पादन

महाराष्ट्रातील गाळप हंगामाने आता गती घेतली आहे. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, हंगाम २०२१-२२ मध्ये ३० डिसेंबर २०२१ अखेर महाराष्ट्रात एकूण १८९ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये ९५ सहकारी तर ९४ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ४६४.५० लाख टन उसाचे गाळप करण्यात आले. तर ४४९.०६ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ९.६७ टक्के आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक ४४ साखर कारखाने सोलापूर विभागात सुरू आहेत. येथील साखर उत्पादन १०० लाख क्विंटलपर्यंत पोहोचले आहे.

साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार ३० डिसेंबर २०२१ अखेर सोलापूर विभागात १११.२१ लाख टन उसाचे गाळप झाले असून ९७.२८ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. येथील साखर उतारा ८.७५ टक्के आहे.
कोल्हापूर विभागाचा साखर उतारा १० टक्क्यांवर आहे. राज्यात सर्वाधिक साखर उत्पादन याच विभागात झाले आहे. कोल्हापूर विभागात ११२.७० लाख टन उसाचे गाळप झाले असून १२३.७४ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. येथील साखर उतारा १०.९८ टक्के आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here