उसाच्या नुकसानीमुळे देशात साखर उत्पादन घटणार

नवी दिल्ली : चीनी मंडी

गेल्या हंगामातील उच्चांकी उत्पादनानंतर देशात यंदाच्या हंगामातही विक्रमी साखर उत्पादन होण्याची अपेक्षा असतानाच, एकूण साखऱ उत्पादन घटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील उसाच्या होत असलेल्या नुकसानीचा परिणाम साखर उत्पादनावर होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात काही भागात उसावर पांढऱ्या अळीचा प्रादुर्भाव आहे. तर उत्तर प्रदेशात उसाच्या क्षेत्रात पाणी साचल्यामुळे तेथेही उसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होताना दिसत आहे.

येत्या २९ ऑक्टोबरला इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (इस्मा) विशेष समितीची बैठक होणार आहे. त्यात यंदाच्या हंगामातील अपेक्षित साखर उत्पादनाचा निश्चित आकडा काढण्यात येणार आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार समिती सदस्य गेल्या वर्षीच्या ३२२.५० लाख टन उत्पादनाच्या तुलनेत यंदा ३२० लाख टन साखर उत्पादन होईल, असा अंदाज काढण्याची शक्यता आहे. यंदा जुलैमध्ये झालेल्या बैठकीत साखर उद्योगातून भारतात ३५० ते ३५५ लाख टन साखर उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

विशेष म्हणजे, यंदाच्या वर्षीही मागणीपेक्षा पुरवठा जास्त होईल, अशा भितीने साखर कारखाने हंगामाच्या सुरवातीलाच धास्तावले आहेत. पण, साखर उत्पादनात झालेली घट, या कारखान्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. कारण, यंदाच्या हंगामाची सुरवातच १०० लाख टन शिल्लक साखरेमुळे होत आहे. आता नव्या हंगामात तयार होणारी साखर साठवण्यासाठी गोदामे उपलब्ध नाहीत, अशी परिस्थिती आहे.

साखर उद्योगातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाने ओढ दिली आहे. विशेषतः मराठवाड्यात कमी पाऊस झाला आहे. कर्नाटकच्या काही भागातही हीच स्थिती आहे. त्याचबरोबर दोन्ही राज्यांत काही ऊस पट्ट्या्ंत पांढऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशातील काही भागांतूनही ऊस उत्पादन घटण्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्र सरकारने दुष्काळी परिस्थितीचा एकूण परिणाम काय होईल, याचा अंदाज घेण्यास सुरुवात केली आहे. त्यात राज्यातील ४५ हजार गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. उसावर पांढऱ्या अळीचा प्रादुर्भाव सांगली, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील ऊस पट्ट्यात आहे. इतर ठिकाणी काहींसा कमी प्रादुर्भाव आहे. या सगळ्याचा ऊस उत्पादनावर परिणाम होणार असल्याचे साखर उद्योगातील तज्ज्ञा्ंचे म्हणणे आहे. पण, त्याचा कितपत परिणाम होईल, याचा अंदाज अजून लावण्यात आलेला नाही.

महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खटाळ म्हणाले, ‘महाराष्ट्रात पांढऱ्या अळीच्या रोगाची चिंता आहे. त्याचबरोबर सप्टेंबरमध्ये पावसाने दडी मारल्याने त्याचाही ऊस उत्पादनावर परिणाम होणार आहे. पण, नेमके किती नुकसान होईल, याचा अंदाज अजूनही लावण्यात आलेला नाही. दुदैवाने राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने मोठ्या प्रमाणावर ऊस चाऱ्यासाठी वापरला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गाळपासाठी ऊस कमी उपलब्ध होईल.’

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची थकबाकी सुमारे २०० कोटी आहे, तर उत्तर प्रदेशत ती १० हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे. साखरेच्या जास्त उत्पादनाचा अंदाज असल्यामुळए गेल्या महिन्यात केंद्राच्या किमान आधारभूत किमतीनंतरही (२९ रुपये प्रति किलो) साखरेचा दर २९.८० ते ३०.५० रुपये प्रति किलो असाच राहिला.

दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्तर प्रदेशात उसाचे क्षेत्र वाढले आहे. पण, सुरुवातील उत्तर प्रदेशातून १३० ते १३५ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज होता. मात्र, आता त्यात घट होणार असल्याचे बोलले जात आहे.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here