महाराष्ट्रातील साखर हंगामाने गती घेतल्याचे दिसून आले आहे. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, हंगाम २०२१-२२ मध्ये २८ डिसेंबर २०२१ अखेरपर्यंत महाराष्ट्रात एकूण १८९ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये ९५ सहकारी आणि ९४ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ४४७.८८ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. राज्यात ४३१.६१ लाख क्विंटल साखर उत्पादन करण्यात आले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ९.६४ टक्के आहे.
पुणे विभागातील साखर कारखाने चांगली कामगिरी करत आहेत. २८ डिसेंबर २०२१ अखेर पुणे विभागात एकूण २९ साखर कारखाने गाळप करीत आहेत. यामध्ये १६ सहकारी तर १३ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. कारखान्यांनी ९२.०३ लाख टन ऊस गाळप केले आहे. विभागात ९०.८ लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे. येथील साखर उतारा १० टक्क्यांच्या आसपास आहे. विभागात सरासरी उतारा ९.८७ टक्के आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक ४४ साखर कारखाने सोलापूर विभागात सुरू आहेत. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार २८ डिसेंबर २०२१ अखेर सोलापूर विभागात १०७.३६ लाख टन उसाचे गाळप झाले असून ९३.६६ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. येथील साखर उतारा ८.७२ टक्के आहे.
कोल्हापूर विभागाचा साखर उतारा १० टक्क्यांवर आहे. राज्यात सर्वाधिक साखर उत्पादन याच विभागात झाले आहे. कोल्हापूर विभागात १०८.९६ लाख टन उसाचे गाळप झाले असून ११९.२६ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. येथील साखर उतारा १०.९५ टक्के आहे.