पावसामुळे ऊस तोडणी बंद, आहुलाना कारखान्याचे गाळप ठप्प

गोहाना : पावसामुळे विभागातील ऊसाची तोडणी आणि भरणी बंद पडली आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या ऊसाची तोडणी करून ठेवला होता, त्यांच्या शेतामध्ये पाणी भरले असल्याने वाहतूक करण्यात अडचणी आल्या आहेत. त्यामुळे आहुलाना येथील चौ. देविलाल सहकारी साखर कारखान्यात नो केन स्थिती निर्माण झाली आहे. ऊस नसल्याने सोमवारी कारखान्याचे गाळप बंद पडले आहे.

यासंदर्भात जागरण डॉट कॉममध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, गोहाना परिसरात सहा ते नऊ जानेवारी या कालावधीत अधुनमधून पाऊस झाला. त्यामुळे अनेक शेतांमध्ये पाणी साठले आहे. शेतांमध्ये माती ओली झाली असल्याने वाहने पोहोचणे अवघड बनले आहे. पावसामुळे शेतकरी तसेच कामगारांना ऊस सोलणी आणि तोडणी करणे अवघड बनले आहे. ऊस शेतातून बाहेर काढणे शक्य झालेले नाही. त्यामुळे सोमवारी दुपारी एक वाजता अखेरच्या ट्रॅक्टरमधून कारखान्याकडे ऊस आला आहे. आता ऊस आल्यानंतर गाळप पुन्हा सुरू केले जाईल असे सांगण्यात आले. आतापर्यंत कारखान्याने १३.२९ लाख क्विंटल उसाचे गाळप केले आहे. कार्यक्षेत्रात १११ गावे आहेत. शेतकऱ्यांनी २१,५०० एकर क्षेत्रात ऊस पिक घेतले आहे. प्रशासनाने ५० लाख क्विंटल ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवले आहे. सोमवारपर्यंत १३.२९ लाख क्विंटलचे गाळप केले. चौ. देवीलाल सहकारी साखर कारखाना आहुलानाचे मुख्य व्यवस्थापक आशिष वशिष्ठ यांनी सांगितले की, हंगामात पहिल्यांदा नो केन स्थिती निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here