स्वराज ग्रीन महाराष्ट्रात स्थापन करणार आशियातील सर्वात मोठे इथेनॉल युनिट

मुंबई : स्वराज ग्रीन पावर अँड ईंधन (Swaraj Green Power & Fuel) कंपनी महाराष्ट्रातील फलटण (सातारा) मध्ये आशियातील सर्वात मोठे इथेनॉल उत्पादन युनिट सुरू करणार आहे. या प्लांटची क्षमता ११०० केएलपीडी प्रती दिन असेल.

प्रसार माध्यमातील वृ्त्तानुसार, पहिल्या टप्प्यात यामध्ये ५०० केएलपीडी प्रती दिन क्षमता असेल. दुसऱ्या टप्प्यात ही क्षमता ११०० केएलपीडीपर्यंत वाढवता येईल. युनिट प्राज इंडस्ट्रीजद्वारे पुरवठा केलेल्या तांत्रिक आधारावर कच्च्या मालाच्या रुपात ऊसाचा रस आणि बायो सीरपचा वापर करेल. हे युनिट पुर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर भारत आणि आशियातील सर्वात मोठा इथेनॉल उत्पादक ठरू शकतो.

फायनान्शिअल एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, स्वराज्य आणि प्राज इंडस्ट्रीजने आता ५०० केएलपीडी क्षमतेच्या विस्तारासाठी एका करारावर स्वाक्षरी केली आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या तिसऱ्या तिमाहीपासून त्याची अंमलबजावणी सुरू होण्याची अपेक्षा आहे. स्वराज समुहाचे संस्थापक आणि प्रमोटर रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांनी सांगितले की, ते केंद्र सरकारचा इथेनॉल मिश्रण कार्यक्रम (ई २०) पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्राजचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद चौधरी यांनी सांगितले की, स्वराज समुह नेहमी कुशल यंत्रांच्या वापरासह आधुनिक औद्योगिक तंत्रज्ञान वापरणार आहे. चौधरी म्हणाले की हा प्रोजेक्ट केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रणाचे उद्दीष्ट पूर्ण करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here