रानीपेट, तामीळनाडू : राज्य आणि केंद्र सरकारकडून राबविण्यात आलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून रानीपेट (Ranipet) येथील शेतकऱ्यांनी अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या उत्पादनात वाढ केली आहे. याशिवाय त्यांच्या इतर खर्चातही खूप घट आली आहे. शेतकऱ्यांनी सांगितले की, ठिबक सिंचनापासून सौर ऊर्जेवर चालणाऱ्या मोटारीपर्यंत विविध उपायांमुळे पाण्याचा कमी वापर झाला आहे. आणि तो नफा वाढविण्यास उपयुकत ठरला आहे. रानीपेटच्या जिल्हाधिकारी डी. भास्करपांडियन यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपल्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी योजनांचा वापर करण्याचे आवाहन केले.
द न्यू इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेतकऱ्यांनी सांगितले की, पारंपरिक पद्धतीने उसाची शेती करून जवळपास ४० टन प्रती एकर उत्पादन मिळते. आता आम्ही ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून प्रती एकर ७० टन उत्पादन घेत आहोत. यातून पाण्याचा फार कमी वापर होतो. इतर विविध खर्चात कपात झाल्याने प्रती एकर फायदा १० हजार रुपयांवरून १५ हजार रुपयांवर पोहोचतो. भास्कर पांडियन यांनी प्रसार माध्यमांना कृषी, इंजिनीअरिंग विभागाच्या कामाची माहिती दिली. या योजनांना पात्र शेतकऱ्यांना केंद्र सरकारने शंभर टक्के अनुदान दिले आहे. यावेळी कृषी विभागाचे संयुक्त संचालक वेलायुथम, कृषी उप संचालक अल्बर्ट रॉबिन्सन, टीएनसीएससीचे विभागीय व्यवस्थापक राजा आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते