चेन्नई : चेन्नई आणि तामीळनाडूच्या इतर क्षेत्रात पावसाने दैना उडवली आहे. तामीळनाडूत पावसाने घडलेल्या घटनांमध्ये बाराहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे चेन्नईच्या हवामान केंद्राने सकाळी नऊ वाजता दिलेल्या अलर्टनुसार, कन्याकुमारी आणि तिरुनेलवेल्ली जिल्ह्यात एक अथवा दोन ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
कन्याकुमारी जिल्ह्यात सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या २४ तासात १००.४८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. बारा ठिकाणी शंभर मिमी पाऊस पडला आहे. आनाकेदंकूमध्ये १८७.४ मिमी अशा सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. कन्याकुमारी आणि त्याच्याशी संलग्न भाग जलमय झाला आहे.
दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन यांनी पावसाचा फटका बसलेल्या कडलूर जिल्ह्यातील कुरिंजीपाडी भागाचा दौरा केला. यावेळी पूरग्रस्तांना मदतीचे साहित्य वितरण करण्यात आली. तर तामीळनाडूचे महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री केकेएसएसआर रामचंद्रन यांनी राज्यातील पूरग्रस्तांपैकी मृत्यूमुखी पडलेल्यांना चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. एक आठवड्यात याचा धनादेश दिला जाईल असे त्यांनी सागितले. बारा लोकांचा मृत्यू झाला असून सर्वांना मदत केली जाईल.