श्रीगोंदा : गेल्या वर्षीच्या गाळप हंगामात नैसर्गिक संकटामुळे ऊसाचे उत्पादन कमी झाल्याने नागवडे कारखन्यात ऊस गाळप झालेच नाही. मात्र यंदाच्या हंगामासाठी कारखाना परिसरात ऊसाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे. इतका ऊस पाहून कारखान्याने यंदा 9 लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे ध्येय ठेवल्याचे, कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी सांगितले.
यंदाच्या हंगामात कारखाना गाळपासाठी जोर धरणार आहे. कारखान्याची यंत्रसामग्री देखभाल दुरुस्तीची कामेही आता शेवटच्या टप्प्यात आली आहेत. त्याचदरम्यान, कारखान्याचे रोलर पूजन अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, सभासदांचे हित हाच कारखान्याचा मूळ हेतू आहे. त्यादृष्टीने नागवडे कारखान्याने सर्वांच्या बरोबरीने उसाला दर दिला. शेतकर्यांची थकबाकी कधीही थकवली नाहीत.बऱ्याचदा एफआरपीपेक्षा जास्त दर दिला आहे. स्व. शिवाजीराव नागवडे उर्फ बापूंचे स्वप्न असलेल्या 26 मेगावॅट क्षमतेच्या सहवीज प्रकल्पाचे कामही आता पूर्ण झाले आहे. आणि हा प्रकल्प यंदापासूनच कार्यान्वित होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रकल्प निर्मितीत काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे या असवानी प्रकल्पाचे अधुनिकिकरण आणि विस्तारीकरणाचे काम आता पुन्हा सुरु झाले आहे. काटकसरीने कारभार करुन सभासद व ऊस उत्पादकांच्या हिताला प्राथमिकता देवून त्यांना अधिकाधिक़ दर देण्यासाठी संचालक मंडळ कटीबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी संचालक विश्वनाथ गिरमकर, श्रीनिवास घाडगे, पंचायत समितीचे माजी सभापती अरुणराव पाचपुते, योगेश भोईटे, विलासराव काकडे, प्रा. सुनील माने, युवराज चितळकर, शरद जगताप, कार्यकारी संचालक रमाकांत नाईक, कारखान्याचे मुख्य अभियंता रामचंद्र मखरे, सहविज निर्मिती प्रकल्पाचे व्यवस्थापक संजय दिघे, संपत कुलांगे आदी उपस्थित होते. कार्यकारी संचालक रमाकांत नाईक यांनी प्रस्ताविक केले तर रामचंद्र मखरे यांनी आभार मानले.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.