संगारेड्डी : तेलंगणात साखर कारखाना कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे हंगाम सुरू होण्यापूर्वीच त्याला ब्रेक लागला आहे. गणपती शुगर्सच्या कामगारांना वेतनवाढीची मागणी करत गेल्या २० दिवसांपासून आंदोलन सुरू ठेवले आहे. परिणामी ऊस तयार असूनही शेतकरी तो तोडणीसाठी पाठवू शकत नाहीत. गळीत हंगामात उशीर होत असल्याने शेतकरी हवालदिल आहेत. अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न गणपती शुगर्सवर अवलंबून आहे. तेही कारखाना सुरू होत नसल्याने तणावाखाली आले आहेत.
द हिंदूमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, गणपती शुगर्सच्या कार्यक्षेत्रात यंदा २.८ लाख मेट्रिक टन ऊसाचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. याशिवाय जहिराबाद येथील ट्रायडेंट शुगर्सच्या सीमेवरील ऊसही येथे गाळपास आणला जातो. कारखान्याकडे २ लाख मेट्रिक टनाहून अधिक ऊस येईल अशी शक्यता आहे. अंडोल, विकाराबाद आणि नरसापूर विभागातील शेतकरी ऊस गाळपास गणपती कारखान्याकडे आणतील.
दरम्यान, गेल्या वीस दिवसांपासून आंदोलन सुरू असूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. आम्ही कामगारांसोबत कारखान्याने करार करावा आणि गळीत हंगाम सुरू करावा अशी मागणी करीत आहोत असे कामगारांनी सांगितले. यादरम्यान, एका अधिकाऱ्याने सांगितले की, कामगार उपायुक्तांकडून कामगार आणि प्रशासनाशी चर्चा सुरू आहे. एक-दोन दिवसात यावर तोडगा काढण्यात येईल.