कोल्हापूर : गेल्या हंगामातील उसाचे प्रती टन ४०० रुपये आणि यंदाच्या गळीत हंगामातील ऊस दराची निश्चिती झाल्याशिवाय कारखान्यांना ऊस देऊ नये, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले आहे. मात्र, काही साखर कारखान्यांनी आपले कारखाना सुरू ठेवला. या कारखान्यांसाठी ऊस वाहतूक करणारी १५ वाहने चंदगड तालुक्यातील पाटणे फाट्यावर अज्ञातांनी अडवली. या वाहनांच्या चाकांमधील हवा सोडण्यात आली.
पाटणे फाटा येथे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या चाकांमधील हवा अज्ञातांनी सोडल्याने सोमवारी रात्री तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकारात वाहनांसह शेतकऱ्यांचे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्यांना पाठविण्यास सहमती दिली आहे. मात्र, आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी आंदोलने सुरूच ठेवली आहेत. दरम्यान, अज्ञातांनी वाहनांच्या टायरमधील हवा सोडल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सोसावा लागला. हवा सोडून अज्ञातांनी पलायन केले असे सांगण्यात आले.