नवी दिल्ली : चीनी मंडी : गेल्या इथेनॉल उत्पादन वाढवण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांचे चांगले परिणाम दिसणार आहेत. इथेनॉल उत्पादनात येत्या काही महिन्यांत २० कोटी लिटरने वाढ होण्याची शक्यता अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.
पेट्रोलमध्ये मिश्रणासाठी इथेनॉल मोठ्या प्रमाणावर उपलब्ध व्हावे, यासाठी मे महिन्यात केंद्राने राष्ट्रीय जैव इंधन धोरणाचा फेरविचार केला. त्यात बी ग्रेड मळी आणि थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीला अनुमती देण्यात आली. तोपर्यंत साखर कारखाने सी ग्रेड मळीपासून इथेनॉल तयार करत होते. मुळात १ अब्ज टन साखर उत्पादन तयार करण्यासाठी लागणाऱ्या उसातून ६४ कोटी लिटर इथेनॉल तयार होते. जे केवळ २ टक्के मिश्रणासाठी गरज भागवू शकते.
अन्न व नागरी मंत्रालयाचे सचिव रविकांत यांच्या म्हणण्यानुसार बी ग्रेड आणि सी ग्रेड मळीपासून इथेनॉल तयार करण्याचे तंत्रज्ञान जवळपास सारखेच आहे. पण, थेट उसाच्या रसापासून इथेनॉल तयार करण्यासाठी मात्र, कारखान्यांना नव्याने काही मशिनरी घ्यावी लागणार आहे.
रविकांत म्हणाले, ‘कारखान्यांनी क्षमता वाढवण्याची तयारी आधीपासूनच सुरू केली आहे. आता प्रोजेक्ट मंजुरी झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होण्यासाठी पुढे सहा ते अठरा महिन्यांचा कालावधी लागेल. आगामी हंगामासाठी डिस्टलरीज् ऑपरेट करता याव्यात म्हणून काहींनी बॉयलर्स इन्सटॉल करायला सुरुवात केली आहे. आम्हाला अपेक्षा आहे की येत्या काही महिन्यांत २० कोटी लिटर इथेनॉल निर्मिती क्षमता वाढेल.’
यातील काही प्रकल्प गेल्या दोन वर्षांपासून प्रस्तावित आहे. शुगर डेव्हलपमेंट फंड आणि इतर काही योजनांच्या माध्यमांतून त्यावर काम सुरू आहे. बी ग्रेड मळीपासून इथेनॉल तयार केल्यामुळे साखरचे उत्पादन २० टक्क्यांनी घटण्याचा अंदाज आहे, थेट उसाच्या रसापासून इथेनॉल तयार केल्यास कारखान्यांच्या साखर उत्पादनावर १०० टक्के परिणाम होईल, पण इथेनॉल उपलब्धता ६०० टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज आहे.