कोरोनातून अशी सावरणार अर्थव्यवस्था, आरबीआय गव्हर्नरांनी सांगितले उपाय

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असून अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सर्व पक्षांनी, महसुली, मुद्रास्थिती आणि विविध क्षेत्रातील धोरणांचे समर्थन करायला हवे असे मत भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केले. दास म्हणाले, एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्यामुळे आर्थिक पुनरुद्धारासाठी सुरू असलेल्या उपायांमध्ये सातत्य राखण्याची गरज आहे.

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, कोविड १९च्या दुसऱ्या लाटेने परिस्थिती पालटून टाकली आहे. अर्थव्यवस्था सुधारणेसाठी आणि तिला रुळावर आणण्यासाठी सर्व पक्षांनी आर्थिक, वित्तीय तसेच इतर क्षेत्रातील धोरणांचे समर्थन करण्याची गरज आहे. आगामी काळात लसीकरणाची गती वाढायला हवी. त्यातून आपण कोरोनाच्या नव्या लाटेवर नियंत्रण मिळवू शकतो. गेल्या काही दिवसांत लसीकरणाची गती वाढली आहे. ती टिकवण्याची गरज आहे.

रिझर्व्ह बँक दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी आपले परंपरागत आणि नवे उपाय करीत आहे. याशिवाय रोकड उपलब्धतेवर भर दिला आहे. बाजारात गतीमानता यावी यासाठी याची गरज आहे. पतधोरण समितीने आर्थिक वाढीला गती देण्यासाठी व्याज दर वाढवलेले नाहीत असे आरबीआयच्या कार्यकारी संचालक मृदुल सागर यांनी सांगितले. सुरुवातीच्या टप्प्यातील जीडीपीतील वाढ अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही. असंघठीत क्षेत्रावर त्याचा परिणाम होईल असे त्यांनी सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here