मध्य प्रदेशातील विविध जिल्ह्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. अनेक जिल्ह्यांत गारपीटीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. आता मध्य प्रदेश सरकारने ज्या शेतकऱ्यांचे पिक खराब झाले आहे, अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशचे कृषी मंत्री कमल पटेल यांनी सांगितले की या शेतकऱ्यांना २५ टक्के नुकसान भरपाई त्वरीत देण्यात येणार आहे.
कृषी मंत्री पटेल म्हणाले, गेल्या दोन ते तीन दिवसांत हवामान खराब आहे. पाऊस आणि गारपीटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना नुकसान झालेल्या जिल्ह्यांचा दौरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, तत्काळ २५ टक्के नुकसान भरपाई दिली जाईल. यापूर्वी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. राज्यातील अनेक जिल्ह्यात गारपीट झाली आहे. मी असे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी, सर्वेक्षण आणि नुकसानीचा आढावा घेण्यास अधिकाऱ्यांना सांगितले आहे. त्यानंतर तत्काळ मदत दिली जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले.