नवी दिल्ली : जुलै महिन्यात रेस्टॉरंट बिझनेसमध्ये पुन्हा जबरदस्त तेजी पहायला मिळाली. रेस्टॉरंट असोसिएशनशी संलग्न सर्व संघटनांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून बाहेर पडून रेस्टॉरंट्सचा व्यवसाय पुन्हा वाढला आहे.
खरेतर लॉकडाऊनच्या काळात लोकांनी रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवणाचा आनंद लुटला नव्हता. मात्र, आता हा व्यवसाय पुन्हा पूर्वपदावर येत असल्याचे सांगितले जात आहे. अनेक रेस्टॉरंट्चा व्यवसाय कोविड पूर्व स्तरापर्यंत आला आहे. देशात अनलॉकनंतर रेस्टॉरंट्समध्ये लोकांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे ऑनलाईन डिलिव्हरी घटू लागली आहे. रेस्टॉरंट आणि हॉटेल इंडस्ट्रीजने दिलेल्या माहितीनुसार, जूनच्या तुलनेत जुलै आणि १५ ऑगस्ट पर्यंत रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांची वर्दळ ३० ते ३५ टक्क्यांनी वाढली आहे.
त्यामुळे घराबाहेर खाण्याचा ट्रेंड लवकरच कोरोना पूर्वीच्या स्तरापर्यंत पोहोचू शकतो असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाने (एनआरएआय) कोविडची लाट ओसरू लागल्याने देशभरात बाहेर खाण्याचा ट्रेंड वाढल्याचे म्हटले आहे. रेस्टॉरंट व्यवसायात २८.८२ टक्के आणि क्यूएसआर श्रेणीत १७.९२ टक्क्यांची वाढ झाली आहे. रिटेल असोसिएशन ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार क्यूएसआरमध्ये जुलैची विक्री ९७ टक्क्यांपर्यंत पूर्वपदावर आली आहे. तर फेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एफएचआरएआय) म्हणण्यानुसार, जादा लसीकरणामुळे ग्राहक आणि रेस्टॉरंट्चा आत्मविश्वास वाढला आहे. जानेवारी २०२१ च्या तुलनेत व्यवसाय ७५ टक्क्यांच्या स्तरावर आला आहे. आगामी सणांच्या कालावधीत पुन्हा ही संख्या वाढू शकते. तर फूड डिलिव्हरीचा ट्रेंड घटला असून ज्या रेस्टॉरंट्समध्ये ८० टक्क्यांपर्यंत होम डिलिव्हरी सुरू होती, ती घटून आता ३० ते ४० टक्क्यांवर आली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link