मुंबई : राज्य सरकारने ऊस तोडणी कामगारांच्या अडचणी सोडविण्यासाठी गोपीनाथराव मुंडे ऊस कामगार कल्याण महामंडळाची स्थापना केली आहे. आणि पुण्यात महामंडळाच्या मुख्यालयात काम सुरू झाले आहे. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी मराठवाड्यातील माजलगाव येथील महेश साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जावून ऊस तोडणी कामगारांशी चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ऊस तोडणी कामगारांच्या कल्याणासाठी समाज कल्याण विभागाने अलिकडेच राज्यात एक सरकारी विद्यार्थी वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
डॉ. नारनवरे म्हणाले की, गोपिनाथराव मुंडे ऊस तोडणी कामगार कल्याण महामंडळाच्या कामाला गती देण्यात आली आहे. महामंडळाच्या माध्यमातून ऊस तोडणी कामगारांसाठी विविध योजना तयार करण्यात येत आहेत. सरकारने यासाठी व्यापक अभियान राबवले असून ऊस तोडणी कामगारांसाठी ओळखपत्रे वितरित केली आहेत. यावेळी औरंगाबाद विभागाचे उपायुक्त जलील शेख, विभागीय उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, रवींद्र शिंदे, साखर कारखान्याचे कर्मचारी, प्रतिनिधी उपस्थित होते.