शामली: अपर दोआब शामली साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने पगाराचे १२ कोटी रुपये अद्याप दिले नसल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. कामगारांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून वेतन मिळवून देण्याची मागणी केली आहे.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कारखान्याचे कामकाज तोट्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांची बिले मिळण्यापासून कामगारांच्या पगारापर्यंत सर्वच गोष्टींची थकबाकी आहे. बुधवारी कामगारांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, २०१८ पासून अनेकांचे वेतन थकीत आहे. कामगारांची १२ कोटींची थकबाकी आहे. ओव्हरटाइमचे पैसेही कारखान्याने थकवले आहेत. २०१३ पासून निवृ्त्त झालेल्या २०० कामगारांचा वेतन फरकही मिळालेला नाही. त्यामुळे कामगारांची आर्थिक स्थिती बिघडली आहे. कामगारांना तातडीने थकीत वेतन मिळावे अशी मागणी साखर कारखाना कामगार युनियन, साखर कारखाना कर्मचारी संघ, शामली श्रमिक संघटना, हिंदू मजदूर सभा आदीच्या पदाधिकाऱ्यांनी केली.